माती परीक्षण
सामान्यतः मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो. परंतु वर्षातून दोन ते तीन वेळा पिके घेतल्यास मातीचा नमुना दरवर्षी घेणे जरुरीचे असते. नत्र खतांचे जमिनीतील प्रमाण दरवर्षाला बदलत असल्याने नत्राचे प्रमाण तपासण्यासाठी मातीचा नमुना दरवर्षी घ्यावा.
नमुना कधी घ्यावा?
खरीप पीक काढल्यानंतर लगेच किंवा एप्रिल—मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत. पिकाला सेंद्रीय अथवा रासायनिक खत घातल्यावर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. नमुना ओला असल्यास सावलीत वाळवून नंतर पिशवीत भरावा.
प्रातिनिधिक नमुना कसा घ्यावा?
१. मातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके व जलसिंचन यांचा प्रामुख्याने विचार करावा.
२. नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत. उदा. चोपण जमीन, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उतारावरची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत.
३. नमुना काढण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे किंवा
ऑगर, घमेली, पॉलिथिन किंवा ताडपत्रीचा तुकडा, गोणपाट, कापडी पिशवी या वस्तूंची जरुरी असते.
४. खालील जागेतून मातीचा नमुना घेऊ नये. अ) पाण्याच्या पाटाजवळील जागा
ब) विहिरीजवळील जागा
क) जनावरे बसण्याच्या जागा
ड) खत आणि कचरा टाकण्याच्या जागा
इ) दलदलीची जागा
फ) बांध व झाडांखालील जागा
५.पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी-रुंदीप्रमाणे कमी-जास्त अंतरावर असाव्यात. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा केलेल्या जमिनीवरील सर्व पालापाचोळा, तण काढून टाकावे. त्या ठिकाणी २२.५ सें.मी. ( वीतभर ) चौकोनी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील सर्व माती हाताने अगर खुरप्याने काढून टाकावी. खड्डयाचा आकार साधारणपणे इंग्रजी 'व्ही' अक्षराप्रमाणे असावा. खड्डयाच्या एका बाजूची साधारण ४ सें.मी. जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी व ती माती घमेल्यात गोळा करावी. अशा पद्धतीने १० ते १२ ठिकाणांहून गोळा केलेली माती पॉलिथिनच्या / ताडपत्रीच्या तुकड्यावर पसरुन चांगली मिसळावी. मातीत असणारे खडे व वनस्पतीची मुळे काढून टाकावी आणि मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर त्याचे चार समान भाग पाडून समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी दोन ओंजळीएवढी किंवा अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत ही क्रिया करावी. हा मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा.
६. विविध पिकांकरिता वेगवेगळ्या खोलीचे नमुने घ्यावेत. उदा. हंगामी पिके ( भात, नागली, भुईमूग इत्यादी) : २० ते २५ सें.मी.; बागायती पिके (ऊस, केळी इत्यादी) : ३० ते ४० सें.मी.; फळबाग पिके (उदा. आंबा, काजू, नारळ, सुपारी इ.) : ६० सें.मी.
७. मातीच्या नमुन्याबरोबर खालील माहिती पाठवावी. अ) नमुना क्रमांक
ब) नमुना घेतल्याची तारीख
क) शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव
ड) शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता
इ) नमुना किती खोलीपर्यंत घेतला त्याची माहिती फ) जमिनीचा उतार
ग) जमिनीचा निचरा
ह) पुढील हंगामात घ्यावयाची पिके
याप्रमाणे माहिती भरुन झाल्यावर मातीचा नमुना बंद करुन जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा. महाराष्ट्र शासनाच्या माती परिक्षण प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात आहेत.
प्रयोगशाळेत विश्लेषण:
तपासणी: प्रयोगशाळेत मातीतील पोषण घटक, पीएच पातळी, सेंद्रिय कार्बन, आणि इतर सूक्ष्म पोषक घटक तपासले जातात.
तंत्रज्ञानाचा वापर: इतर विश्लेषणांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर केला जातो.
अहवाल तयार करणे:
निष्कर्ष: प्रयोगशाळा मातीतील पोषण घटकांचे प्रमाण आणि इतर बाबींवर आधारित एक अहवाल तयार करते.
सल्ला: अहवालावर आधारित, शेतकऱ्यांना कोणती पिके घेणे, कोणत्या प्रकारचे आणि किती प्रमाणात खत वापरावे याचे सल्ले दिले जातात.
मातीचा पोत पाहण्याची 'फील' पद्धत
हाताचा अंगठा व तर्जनीमध्ये माती दाबली असता स्पर्शज्ञानाने त्यातील वाळू, पोयटा आणि मृत्तिका यांचे प्रमाण अंदाजाने ओळखणे म्हणजेच जमिनीचा पोत ओळखणे होय. या पद्धतीला 'फील' पद्धत म्हणतात. ओलसर माती घ्यावी व ती दोन बोटांमध्ये थोड्याशा ताकदीने वळावी. मातीमध्ये मृत्तिका कणांचे प्रमाण जास्त असल्यास मातीचा आकार लांबट होतो. त्याला चिकटपणासुद्धा जास्त असतो. वाळूचे प्रमाण जास्त असल्यास हाताला खरखरीतपणा जाणवतो. पोयट्याचे प्रमाण जास्त असल्यास पिठूळ अथवा गुळगुळीतपणा जाणवतो. परंतु त्याचा चिकटपणा मृत्तिकाकणापेक्षा कमी व वालुकणापेक्षा जास्त असतो. या पद्धतीने शेतातसुद्धा जमिनीचा पोत ओळखता येतो.
माती परीक्षणाचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे शेती अधिक प्रभावी व उत्पादनक्षम होऊ शकते. काही महत्त्वाचे फायदे असे आहेत:
मातीतील पोषण घटकांची माहिती: माती परीक्षणाद्वारे मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि इतर सूक्ष्म पोषण घटकांचे प्रमाण कळते, ज्यामुळे योग्य खतांचा वापर करता येतो.
खतांचा योग्य वापर: माती परीक्षणाच्या अहवालावर आधारित शेतकरी आवश्यकतेनुसार खतांचा वापर करू शकतात, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.
पीक पद्धतीचा सुधारणा: माती परीक्षणामुळे मातीच्या प्रकारानुसार कोणत्या पिकाची लागवड करावी याचे ज्ञान मिळते, ज्यामुळे उत्पादन सुधारते.
मातीच्या आरोग्याची जाणीव: माती परीक्षणामुळे मातीतील सेंद्रिय घटक आणि पीएच पातळीची माहिती मिळते, ज्यामुळे मातीची गुणवत्ता टिकवण्यास मदत होते.
पर्यावरणाचे संरक्षण: योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्याने पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.
जल संसाधनांची बचत: माती परीक्षणाद्वारे पाण्याची आवश्यकता आणि व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते, ज्यामुळे पाण्याची बचत होते.
हे फायदे माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतात.